रमेशदादा पंचाहत्तरी

आज आमच्या रमेशदादाच्या म्हणजे तुम्हा गोरेगांवकरांच्या मामाचा पंचाहत्तरीचा सोहळा आहे हे या सोहळ्याला आलो असून सुद्धा खरंच वाटत नाही अजूनही त्याला पंचाहत्तरीचा समजणं हे मनाला पटतच नाही. केवळ त्याचे केस पांढरे झाले आणि शारीरीक हालचालींमधे किंचित बदल झाला आहे येवढंच. पण ऊमेद आजही तीच आहे जी पंचवीशीत होती. हा माणुस म्हणजे उत्साहाचा खळाळता झरा आहे. उद्योगप्रिय आणि लोकांच्या मदती करता सदैव तत्पर. आज मी तुमच्या समोर ऊभा आहे, तुम्हाला वाटत असेल की हा माणूस दोन शब्द बोलायला ऊभा आहे म्हणजे नक्कीच मामा पेक्षा सिनीयर असणार पण आता माझ्याकडे पाहून तुम्हाला खरं वाटणार नाही कि या ईसमाने मला अंगाखांद्यावर खेळवलंय आणि याचे सर्व पुतणे  आणि मी आम्हा सर्वांचे याने भरपूर लाड पुरवले आहेत.
माझे आई लडील यांच्या घरात १९५७ साली भाडेकरु म्हणून रहायला आले. माझा जन्म १९६१ चा आणि माझी या पाटील कुटुंबियांशी तेव्हापासूनची ओळख. रमेशदादा म्हणजे अवघड कामं चुटकी सरशी करणारा आणि तितकाच हरहुन्नरी म्हणून सगळ्यांच्या गळ्यातला ताईत.
खरं तर माझ्याच वयाचे याला पुतणे, भाच्या वगैरे आहेत पण कसं कुणास ठाऊक मी मात्र याला माझा रमेश दादाच म्हणतो. याच्या ईतर भावंडांना मी काका आणि आत्या म्हणतो पण हा मात्र माझा दादाच राहीला.  याचं लग्न झालं आणि मला वहीनी आली. मी लग्नाला हजर नव्हतो पण सुटीत जेव्हा होस्टेलवरुन घरी आलो तेव्हा वहीनीला बघायला गेलो होतो नवीन वहीनी आजही माझ्या डोळ्या समोर ऊभी आहे. वहीनीनेही माझ्यावर खुप माया केली.  दोघंही अगदी प्रेमाने वागत असत. आणि आम्हा सर्व मुलांवर लक्ष ठेऊन असत. आम्हाला कधीच असं वाटलं नाही की आम्ही भाडेकरु आणि हे घरमालक आहेत. स्वतःच्या पुतण्यांचे जेवढे लाड तो करत असे तेवढेच तो माझेही करत असे. आमची काळजीही तो तितकीच करत असे. एकदा आम्हा मुलांपैकी एक जण रस्त्यावर पतंग पकडायला धावताना याला दिसला तर याने घरी आल्यावर सर्व मुलांना समोर बोलावून अशी तंबी दिली कि काही विचारु नका. याला भिती होती कि पतंगाच्या नादात कुठे अपघात झाला तर पोरांचं आयुष्याचं नुकसान व्हायचं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घरी येताना आम्हा सर्वांसाठी एक मोठा बॉक्स भरुन हा पतंग घेऊन आला आणि म्हणाला आता एकही जण मला पतंग पकडायला रस्त्यावर धावताना मला दिसता कामा नये किंवा माझ्या कानावर अशी गोष्ट येता कामा नये. असा हा आमचा रमेशदादा.किती म्हणून आठवणी सांगू याच्या? वेळ पुरणार नाही. आमचे तर याने लाड केलेच पण आता आमच्या मुलांचेही तो लाड करतो. माझ्या मुली तर त्याला शिट्टीवाले आजोबा म्हणत असत. आम्हाला सोडून व्यवसायाला सोयीस्कर म्हणून तो तुमच्या कडे आला आणि दूधात साखर मिसळावी तसा मिसळून गेला. प्रेमजीभाई, विरेन पटेल किंवा विनोद यांच्या बोलण्यावरुन समजतं कि हा ईसम ईथेही लोकप्रिय झालाय. जिथे जातील तिथल्या लोकांना आपलंसं करुन घेणाऱ्या या दांपत्याला देवाने उदंड निरोगी आयुष्य देवो आणि त्यांची माया आम्हाला पुढील अनेक वर्ष लाभो हीच प्रार्थना मी देवा जवळ करतो.

Comments

Popular posts from this blog

देव आनंद

भक्ती